मुंबईतील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत "निसर्ग" चक्रीवादळाने केलेल्या नुकसानी बद्दल आढावा घेण्यात आला.
पंचनामे पुर्ण होताच भरीव आर्थिक मदत कशी देता येईल यावरच या बैठकीत चर्चा झाल्याचं रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितलं. प्रत्यक्ष घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे नुकसानग्रस्तांनी भरीव मदत मिळेल अशी माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी कोकणात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. लोकांशी त्यांनी सवांद साधला. काही निर्णय सरकारने चांगले घेतले आहेत तर राज्य सरकारने आणखी काही निर्णय घेणं अपेक्षित असून त्यावर चर्चा झाल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे 50 टक्के पेक्षा जास्त पंचनामे झाले आहेत. वीज पुरवठा सुरू होण्यास काही वेळ लागू शकतो. विद्युत पुरवठा सुरू व्हावा यासाठी पवार साहेबांनी सूचना दिल्या आहेत. पंचनामा आढावा आल्यानंतर पंतप्रधान यांना भेटण्याची शरद पवार यांनी सांगितलं आहे. तर पवार यांनी जे पाहिलं त्या सूचना राज्य सरकारला देण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटले यात राजकारण नाही अशीही माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे
दरम्यान, शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांआधी माणगाव, मोरबा म्हसळा या गावांना भेट दिली होती. माणगावमध्ये बाजारपेठ, मोरबा इथे गावकऱ्यांची विचारपूस केली होती. शेतीचं मोठं नुकसान झालं. शरद पवार यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानाची पाहाणी केली. या दरम्यान, शरद पवार यांनी मोरबा येथील मदरशाला भेट दिली.
चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडला 100 रत्नागिरीला 75 कोटी रुपये व सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसानाचे पंचनाने पूर्ण झाल्यानंतर आणखी मदत दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे