मुंबई : राज्यातील ग्रामीण भागांतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.
या संदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या हजार रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. या वर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरुस्तीयोग्य राहिलेल्या नाहीत.