विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. पण सरकार स्थिर होत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकासआघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शिवसेनेने त्यांचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही ही नाराजी बोलून दाखवली.
एकीकडे महाविकासआघाडीमध्ये नाराजी असतानाच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय उलथापालथाचे संकेत दिले आहेत. आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि राज्यात सगळ्यात कमी आमदार असलेला पक्ष काँग्रेस सरकारला पाठिंबा देत सत्तेत आहे. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असूनही त्याला विरोधी पक्षात राहावं लागलं आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचं मत फडणवीसांनी मांडलं.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक घ्यावी लागणार आहे. यावरून सामनामधून नाराजी व्यक्त करण्यात आली. 'काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल', असं सामनामध्ये लिहिण्यात आलं आहे.