पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. आपण करोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वेळेवर केलेलं लॉकडाउन आणि इतर महत्त्वाचे निर्णय यामुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचं पालन करण्यात आलं. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
खास करुन कंटेटमेन्ट झोनची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला नियम न पाळणाऱ्या लोकांना रोखावं लागेल आणि त्यांना नियमांचं महत्त्व समजावून लागेल असंही मोदींनी म्हटलं आहे. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातली परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता अनलॉक २ सुरु करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे. निष्काळजीपणा करु नका असंही त्यांनी सांगितलं आहे. आज व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधला.