नवी दिल्ली, 8 मे : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या स्थितीवर भाष्य केलं. यावेळी राहुल गांधी यांनी देशातील मजुरांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि कार्यशैली याबाबत विचारलेल्या प्रश्नालाही उत्तर दिलं आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा देशाला फायदा झाला की तोटा?' असा प्रश्न राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधानांची एक शैली आहे. ती त्यांच्या जागी आहे. मात्र माझी इच्छा आहे की अशा घटनांवेळी फक्त एका कणखर नेत्याशिवाय खूप सारे कणखर मुख्यमंत्री, कणखर पंतप्रधान, कणखर जिल्हाधिकारी असायला हवेत. अशा समस्यांचा स्थानिक पातळीवरच नायनाट व्हायला हवा,' असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :
केंद्र आणि राज्यात समन्वय असावा
मजुरांच्या खात्यात थेट पैसे देणे गरजेचं
संकटातून बाहेर पडायचं आहे
मजुरांना पाठिंब्याची गरज आहे
अन्यथा बेरोजगारीची त्सुनामी येईल
न्याय सारख्या योजनांची आता खरी गरज
लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना चालना देणं गरजेचं
गरजूंना थेट मदत , पैसे, अन्नधान्य देणं आवश्यक
आता लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी प्रयत्न व्हावेत
केंद्र सरकारने कामात पारदर्शता आणावी