मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र सध्या दिसतं आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नवीन त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधून दिलासा देण्याचाही प्रयत्नही केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांनाही दिलासा दिला. स्थलांतरित मजुरांना लवकरच त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच वाढत्या रुग्णसंख्येमागे सर्वात जास्त होणाऱ्या चाचण्या हे मुख्य कारण असल्याचंही स्पष्ट केलं. करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला ती बाब दुर्दैवी आहे असंही त्यांनी सांगितलं. अशा सगळ्या गोष्टी असतानाही आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतली परिस्थिती ही ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेली असं म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत फडणवीस?
“महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. मुंबईतली परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेली असं चित्र दिसतं आहे. पहिल्या लॉकडाउनपासूनच धोरणात्मक निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन आहेत आणि त्यांना कोणताही प्रशासकीय अनुभव नाही.”