महाराष्ट्रात बुधवारी 679 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले. राज्यात आतापर्यंत 10 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यात मागील 24 तासात 2250 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 39 हजार 297 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात 65 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत 41, नवी मुंबई 3, पुणे 13, औरंगाबाद, उल्हासनगर आणि सोलापुरात प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये 46 पुरुष आणि 19 महिला रुग्ण आहेत. सध्या राज्यात 27 हजार 581 रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 लाख 07 हजार 72 नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 475 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 39 हजार 297 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 04 हजार 692 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 26 हजार 752 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.