मा. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांनी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अभिनव कार्य करून समाजाला वेगळी दिशा दाखवली. सन १९५० मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर आपले संपूर्ण जीवन गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील मागासलेल्या क्षेत्रात ज्ञानसंग्रह व ज्ञानप्रसार अशा महत्त्वपूर्ण कार्यासाठी खर्च केले. सन १९६२ ते १९७२ या कालखंडात श्रद्धेय गुरुजी हे राजनीती मध्ये या क्षेत्राचे मार्गदर्शक होते.
ते लोकांचे इतके लाडके होते की त्यांना लोकांनी भंडारा लोकसभा मतदार क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून दिले. त्यांनी वनवासी लोकांना आर्थिकदृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले. राजनीतीत राहून त्यांनी शिक्षण प्रसार कार्यात गतिशील प्रवाह आणले. दि. २जुलै १९९२ मध्ये ग्राम चोपा मध्ये शिक्षणाचा मार्ग नव्हता तेथे रवींद्र विद्यालय नावाची शाळा सुरू केली.
मानकर गुरुजींचे कर्तव्य एखाद्या दिप स्तंभा सारखे आहे. ते किती जीवन जगले यापेक्षा ते जीवन कसे जगले हे अधिक महत्वपूर्ण आहे. जसे वैचारिक सामंजस्याच्या भावनेतुन मोठे कार्य पूर्णत्वास जाते व त्याला अधिष्ठानाचे स्वरुप प्राप्त होते, त्याप्रमाणे गुरुजींनी स्थापन केलेली भवभूति शिक्षण संस्था हे मोठे अधिष्ठान आहे.
श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी संपूर्ण प्रदेशात एक सशक्त राजनेता म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना जोडण्याचे आणि समोर वाढविण्याचे कार्य त्यांनी सदैव केले. आज श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती निमित्त त्यांच्या आदर्शांना आत्मसात करणे त्यांच्या प्रती भावपूर्ण श्रद्धांजली असेल.
*आमदार विनोद अग्रवाल*