जम्मू काश्मीर, 02 मे : एककीडे जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या खोड्या काही थांबत नाही आहेत. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 2 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पाकिस्ताननं बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये कोणत्याही कारणास्तव गोळीबार केला होता. त्यावेळी ही दुखद घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सोबतच्या या चकमकीला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं पण पाक गोळीबारात चार सैनिक जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा उपचारादरम्यान दोन सैनिकांचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा त्यांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत सैनिकांची ओळख पटली असून, त्यातील एक सैनिक गोकर्ण सिंह आणि दुसरे नायक शंकर एस.पी. आहेत.
पाकिस्तानने दुपारी केला गोळीबार
सैनिक हवालदार नारायण सिंह आणि नायक प्रदीप भट्ट अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सैनिकांची नावं आहेत. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया म्हणाले की, शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास नियंत्रण रेषेजवळील रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्ताननं विनाकारण गोळीबार सुरू केला, त्या दरम्यान तीन सैनिक जखमी झाले होते.
चार लोक झाले जखमी
यापूर्वीही पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात चारजण जखमी झाले होते. पाकिस्तानने नागरी भागात केलेल्या गोळीबारामुळे लोकांचे मानसिक हाल झाले होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात चारुंडा, बटग्रान, हाथलंगा, मोथळ, साहूरा, सिलिकोट, बालाकोट, नाम्बाला आणि गरकोट ही गावं आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.
पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराचा परिणाम उरी शहरपर्यंत दिसून आला आणि एसडीएम कार्यालयापर्यंतही पोहोचला. उरीचे एसडीएम रियाझ अहमद मलिक यांनीही या गोळीबारात जखमीची कबुली दिली आहे. ते म्हणाले की, तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.