नवी दिल्ली, 13 मे : कोरोना व्हायरसबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही तर लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचं गडकरी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. नितिन गडकरी म्हणाले की, सध्या आम्ही कोरोना व्हायरससह आर्थिक लढाई लढत आहेत. भारत गरीब देश असून महिन्या दरमहिन्याला लॉकडाऊन वाढवू शकत नाही. आम्हाला सुरक्षेच्या उपायांसह बाजार खुले करावे लागतील.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत नितिन गडकरी म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन, इटली सारख्या देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित स्थितीत दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण खूप कमी प्रमाणात आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबद्दल गडकरी म्हणाले की, याचा निर्णय फक्त माझ्या मंत्रालयाकडे नाही. मी याबाबत सकारात्म आहे आणि आशा आहे. उद्योग क्षेत्रात त्यांच्या कामगारांना खाण्याची आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. या संकटात सकारात्मक राहणं आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याचं आव्हान असेल.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75 हजारांवर पोहोचली आहे. यामुळे आतापर्यंत 2415 जणांचा मृत्यू झाला असून 24386 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल गुजरात, तामिळनाडू आणि दिल्लीत रुग्णांची संख्या जास्त आहे.