मुंबई, ठाणे आणि उपनगरासह राज्यातील अनेक भागांमध्ये मध्य रात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरा दमदार पाऊस झाल्यानं हवेत गारवा वाढला आहे तर पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला तरी तुरळ पावसाच्या सरी अधून मधून पडत आहेत. मुंबईसह उपनगरात पावसामुळे गारवा वाढल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवा,डोंबिवली,कल्याण आणि ग्रामीण भागात दोन दिवसापासून अधून मधून रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. डोंबिवलीमध्ये मध्य रात्री 1.15 मिनिटाला पावसाला सुरुवात झाली. डोंबिवली,ग्रामीण आणि परिसरात मध्य रात्री पाऊस पडल्याने वातावरणात अजून थंडावा निर्माण झाला आहे.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पहाटे पावसाने चांगलाच जोर धरला असून शहरातील नजराणा ते तीनबत्ती या भाजीपाला बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ झाली. संपूर्ण बाजारपेठेत चिखल झाल्याने नागरिकांचे पाय घसरू लागल्याने सांभाळून येजा करावे लागत आहे, तर पावसाची शक्यता नसल्याने छत्री न आणल्याने नागरिकांना पावसात भिजावे लागले आहे. तर अनेक ठिकाणी कापून ठेवलेल्या भाताच्या पेंढी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे.