मुंबई, 10 मे : कोरोनाच्या हाहाकारामुळे जगभरातील अनेक देशांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भामुळे अनेक मोठ्या स्पर्धा, सण-उत्सव रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जाणार गणेशोत्सव यंदा होणार की नाही, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. मात्र आता बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने एक पत्रक काढत गणेश मंडळांसाठी एक नियमावली जाहीर केली आहे.
काय आहे नियमावली?
1. वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे .
2. श्रीमूर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा . शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे .
3. मंडप/रोषणाई- मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा . या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण , सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.
4. आगमन- श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे .
5. श्रीदर्शन- मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस ( भटजी कार्यकते इ) हात - पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे .
6. कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे .
7. विसर्जन- आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.