महाराष्ट्रात मागील चोवीस तासात महाराष्ट्रात 2487 नविन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 67 हजार 655 झाली आहे. यापैकी बरे झालेले रुग्ण वजा केल्यास सध्या महाराष्ट्रात 36,031रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा 2286 वर जावून पोहचला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.
पुढे ते म्हणाले, कालच्या एका दिवसात 1 हजार 248 जण कोरोनामुक्त झाले असून आता पर्यंत 29 हजार 329 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.7 दिवस होता तो आता वाढून 17.5 झााला आहे. तर मृत्युदर 3.37 असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते 43.35 टक्के आहे.
राज्यात काल झालेल्या 89 मृत्यू मध्ये मुंबईत 52, नवी मुंबईत 9, ठाणे 5, कल्याण-डोंबिवली 4, मालेगाव 6, पुणे 9, सोलापूर 2, उस्मानाबाद आणि यवतमाळ प्रत्येकी एक – एक या रुग्णांचा समावेश आहे. एकूण 89 मृत्यूंमध्ये 46 पुरुष आणि 43 महिला आहेत.
महाराष्ट्रात सध्या 5 लाख 58 हजार 100 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 34 हजार 480 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज पर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 67 हजार 655 जण पॉझिटिव्ह आले आहेत.