मराठा आरक्षणास (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यात विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडी सरकारला याबाबत जबाबदार धरलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशोक चव्हाण यांची परिस्थिती 'गिरे फिर भी टांग उपर' अशी आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्थगिती न मिळता घटनात्मक खंडपीठाकडे प्रकरण गेलं असतं तर हा सरकारचा नैतिक विजय झाला असता. मात्र, या प्रकरणी नैतिक विजय झाला असं म्हणणं हे चव्हाण यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे, घटनामत्मक खंडपीठाकडे हे प्रकरण गेल्याने आता हा खटला 30 ते 40 वर्षे चालेल, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकारनं नेमलेल्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, असा गंभीर आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.