लॉकडाउनच्या काळात बालविवाहाच्या गंभीर समस्येने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. बीड जिल्ह्यात लॉकडाउन कालावधीत 56 बालविवाह रोखले असल्याचं समोर आलं आहे. कायद्याला पायदळी तुडवून शेकडो विवाह लागल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.
बीड तालुक्यातील कोळवाडी इथल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 26 वर्षीय मुलाबरोबर लावून देण्यात येत होता. याची माहिती 'बेटी बचाव बेटी पढाव समिती'ला मिळताच सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने मुलीच्या वडिलांचे समुपदेशन करण्यात आले. शिवाय त्यांना नोटीस देऊन बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
लॉकडाउनच्या काळात बीडमध्ये महिला बाल समितीच्या सदस्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी 56 विवाह रोखून मुलीच्या वडिलांचे मुलाचे समुपदेशन केले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरी होणाऱ्या विवाहामध्ये सर्रास बालविवाह प्रतिबंधक कायद्याला बगल देऊन हजारो विवाह लावले जात आहेत. यामुळे येणाऱ्या काळात या बालविवाहाचे गंभीर दुष्परिणाम सोसावे लागतील, असा अंदाज सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत
या अगोदर रोखण्यात आलेल्या बालविवाहांमध्ये मुलींचे वय हे 13 ते 16 या वयोगटातील आहे. तर मुलांचे वय 25 ते 30 अशी आहेत, यात अज्ञान अंधश्रद्धा आणि गैरसमज याबरोबर सुशिक्षित त्याचा अभाव यातून हे विवाह होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी सांगितले.