बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं वयाच्या 34 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. काहींच्या मते सुशांतनं डिप्रेशनमुळे आत्महत्या केली असं म्हटलं आहे तर काही या आत्महत्येचा संबंध बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीशी जोडला आहे. अशात बिहारमध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी यांसारख्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या विरोधात सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यानंतर भन्साळी यांनी आता या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला एक-दोन नाही तर तब्बल 4 वेळा आपल्या प्रोजेक्टमध्ये समील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही कारणानं तो या सिनेमांचा भाग होऊ शकला नाही. अर्थात भन्साळी यांनी या सिनेमाची नावं स्पष्ट केलेली नाहीत.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी यांच्यासह 8 व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. एक वकील सुधीर ओझा यांनी सलमान खान, करण जोहर, आदित्य चोपड़ा, एकता कपूर, संजय लीला भंसाली, साजिद नाडियाडवाला यांच्यासह एकूण 8 लोकांच्या विरोधात सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करत FIR दाखल केली आहे. सुशांत बिहारचा रहिवासी होता आणि त्यानं स्वतःच्या कष्टानं यश मिळावलं होतं. त्यामुळेच या लोकांनी त्याच्या विरोधात कट रचून त्याला इंडस्ट्रीमधून बाहेर करण्याचा प्रयत्न केला असं सुधीर ओझा यांचं म्हणणं आहे.
सुशांतनं त्याच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'काय पो छे' या सिनेमातून केली होती. त्यानंतर तो याच वर्षी 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये दिसला, त्यानंतर 2014 मध्ये आमीर खानचा 'पीके', तर 2015 मध्ये त्यानं 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' हा सिनेमा केला. पण त्याला सर्वाधिक यश मिळवून दिलं ते 2016 मध्ये रिलीज झालेला धोनीचा बायोपिक, 'एम. एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी' या सिनेमानं. यानंतर सुशांतनं 'राब्ता', 'वेलकम टु न्यूयॉर्क', 'केदारनाथ', 'सोनचिड़िया' आणि 'छिछोरे' यासारख्या सिनेमात काम केलं. यापैकी त्याच्या छिछोरेनं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती