एल्गार परिषदेमध्ये हिंदुत्वावर टीका करणाऱ्या शरजील उस्मानी (sharjeel usmani) याच्याविरोधात कारवाईचा फास आता आणखी आवळला जात आहे. महाराष्ट्रानंतर आता लखनऊमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
एनआयए वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी यांच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एल्गार परिषदेच्या मुद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबई पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसंच 'राज्यात हिंदूंबद्दल असं बोलणाऱ्यांवर काही कारवाई का नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कोणी काहीही बोलायचं का? 5 दिवस झाले तरी काही कारवाई झालेले नाही म्हणून मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र लिहिलं आहे. यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली होती.
तर दुसरीकडे, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून 'हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत आहे व तेथून तयार झालेला माल देशभरात जात असतो. हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे. त्या पळून गेलेल्या व लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी त्यांची आहे व याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना, ही शंका म्हणूनच आहे' असा टोला सेनेनं योगी सरकारला लगावला.