महिला उद्योजिकांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा उत्तम असल्याचे सिध्द झाल्यानंतरच त्यांना बाजारात मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यावर यश मिळेल. त्यानंतरच महिला कलाकार आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील. चमत्काराशिवाय कुणी नमस्कार करीत नाही, हे महिला उद्योजिका, महिला कलाकार यांनी लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त ना. गडकरी ‘विकी’च्या पदाधिकार्यांशी ई संवाद साधत होते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला कलाकार, या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- उत्पादनाचा दर्जा आणि आकर्षक डिझाईन यावर आपल्या उत्पादनाची निवड अवलंबून असते. यासाठी उद्योजक, कलाकार महिलांनी आत्मपरीक्षण करावे. दर्जा, डिझाईनसोबतच उत्पादनाचे पॅकेजिंग, सादरीकरणही उत्तम असणे आवश्यक आहे. आपल्या उत्पादनाची विक्री आपल्याला करायची आहे. त्यासाठी बाजाराचे कौशल्यही असणे आवश्यक आहे. उद्योजक महिलांमध्ये असे कौशल्य असते. उत्पादनाचा दर्जा चांगला असेल तर मार्केटिंग करणे सोपे जाते, असेही ना. गडकरी म्हणाले.
भारतीय संस्कृती, साहित्य, कला या क्षेत्रात अनेक महिला काम करतात. आपल्या कलेचा विकास कसा करता येईल, याचा विचार केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- ज्ञानाचे संपत्तीत आणि कचर्याचे मूल्यवर्धन करून संपत्तीत रुपांतर कसे करता येईल, या दृष्टीने महिला कलाकार आणि उद्योजिकांनी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. कलेसोबत नवीन उद्योजिका निर्माण झाल्या पाहिजेत. नवीन उद्योग सुरु झाले तर रोजगार निर्मिती अधिक होईल, यामुळेच देश आत्मनिर्भर होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.