उमरखेड : - *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
विडूळ येथील स्मशान भूमीत झाडे लावून त्याचे नियमितपणे संगोपन होत असल्याचे पाहून अज्ञात विघ्नसंतोषी समाज कंटकाने आग लावून त्या वृक्षांची जाळपोळ केली या आगीत जवळपास ५० झाडे जळून भस्मसात झाली आहेत . या घटनेला ५ ते ६ दिवस झाले असतांना स्थानिक प्रशासनाला साधी चौकशी करायला वेळ मिळाला नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे .
विडूळ येथील वृक्षप्रेमी पत्रकार भिमराव नगारे यांनी स्मशान भूमीत वड , पिंपळ , कडुनिंब , आवळा , आंबा , चिंच , अशी विविध प्रकारच्या जातींची सुमारे ५०० च्या जवळ पास वृक्ष लागवड कडून त्यांची पाच ते सहा वर्षा पासून निगा राखण्याचे काम करीत दररोज पाणी घालण्याचे नित्यनेमाने काम केले . परंतु अज्ञात व्यक्तीने तेथे आग लावली त्या आगीत सुमारे ५० झाडे जळून भस्मसात झाली . तोच प्रकार काल सकाळीही झाला त्यातही पाच सहा झाडे जळाली स्थानिक ग्राम पंचायतला व पोलीस पाटील यांनाही हा प्रकार लक्षात आणून दिला असतांना ही कुठलीही दखल न झाल्याने अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याच्या कुरापती वाढल्या आहेत . आपण लावलेली झाडे जळून भस्म झाल्याचे दिसून येताच वृक्षप्रेमी नगारे यांना गहिवरुन आले . कुठल्याही प्रसिध्दीचा हव्यास न ठेवता सेवाभावी वृत्तीने वृक्ष लागवड करून त्याची तळहातावरील फोडा प्रमाणे निगा राखण्याचे निस्वार्थी पणे कार्य करणाऱ्या नगारे यांना ५० वृक्ष भस्मसात झाल्याचे अपार दुखः झाल्याचे दिसून आले .
प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी पत्रकार भिमराव नगारे यांनी केली आहे.