स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषदेचे निवेदन
औसा/प्रतिनिधी:केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीनचा दर कोसळला आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही शिल्लक राहणार नसून उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन हवेतच विरणार आहे.सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषद गांधी जयंती दिनी मुंडण आंदोलन करणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषदेच्या वतीने यासंदर्भात औसा तहसिलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.देशात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतात.गतवर्षीच्या हंगामातील सोयाबीनला यंदा चांगला दर मिळत होता.१० हजार ते ११ हजार दरम्यान सोयाबीनचा दर असताना केंद्र सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांच्या दबावामुळे १५ लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला.यामुळे बाजारातील सोयाबीनचा दर घसरला. वास्तविक बहुतांश शेतकऱ्यांनी २८०० ते ४५०० रुपये दर असताना सोयाबीनची विक्री केली.याच दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली व आता वाढलेल्या दराचा फायदा घेतला.मुळात शेतकऱ्यांना एकरी सोयाबीन उत्पादनासाठी सरासरी २१६००रुपये खर्च येतो तर उत्पादित सोयाबीनची विक्री केल्यानंतर ३० हजार रुपये पदरात पडतात.वर्षाकाठी ८४००रुपये एवढी किरकोळ किंमत शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे उत्पन्न दुप्पट होण्याची घोषणा कुठे आहे ? असा सवालही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने सोया पेंड आयात करण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे.हा निषेध नोंदवण्यासाठी दि.२ ऑक्टोबर रोजी मुंडण आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे,बहुजन रयत परिषदेचे महासचिव राजीव कसबे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश माडजे,निराधार संघर्ष समितीचे यांदगडू बरडे,हिरालाल कांबळे,च्अजित काळे,राहूल गायकवाड,बालाजी कसबे,साहेबराव जगताप,गौतम कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.