सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )नंदुरबार
नंदुरबार - सुसाट धावणारा वाळू डंपर मोटरसायकलचा चुराडा करत एका घरावर जाऊन धडकला आणि घरात झोपलेल्या दोन तरुणांना चिरडून मगच थांबला. मध्यरात्री अचानक घडलेल्या या अपघातामुळे नांदखेडा गाव पूर्ण हादरून गेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी पहाट होण्याआधी म्हणजे मध्यरात्री 1 वाजे दरम्यान नंदुरबार तालुक्यातील साक्री रस्त्यावर नांदरखेडा फाटा पासून पाचशे मीटर अंतरावर रस्त्यापासून जवळ असलेल्या घरात प्रवीण बाबूलाल राठोड आणि विक्रम श्रावण जाधव हे अनुक्रमे 26 आणि 20 वर्षे वयाचे दोन्ही तरुण झोपलेले असतानाच जणू काळाने झडप घातली. रस्त्यावरून भरधाव वेगात चाललेला एम एच 39 पी 8194 क्रमांकाचा वाळू वाहून येणारा आयवा ट्रक अचानक अनियंत्रित होऊन या घरावर येऊन धडकला भिंत फोडून काढत सरळ झोपलेल्या दोन्ही युवकांवरून चालून गेला. यामुळे झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. झालेल्या प्रचंड आवाजाने गावकरी धावून आले. तोपर्यंत ट्रकचालक फरार झाला. या धडकेमुळे दिनेश सुकलाल पवार वय वर्षे 24 हा तिसरा तरुण जखमी झाला आहे. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घराला धडक देताना अंगणात लावलेली एम एच 04 जेके 54 55 क्रमांकाची मोटरसायकल सुद्धा डंपरखाली चेंदामेंदा झालेली दिसली. पहाटे पर्यंत हे वृत्त पसरताच सकाळी नांदरखेडा गावात संतप्त जमाव जमा झाला. मोर्चा काढून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या समूहाला वेळीच धावून गेलेल्या पोलिसांनी नियंत्रणात आणले तथापि भरधाव वेगात वाहणाऱ्या वाळू गाड्यांबद्दल लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
वेगाने धावणाऱ्या वाळू वाहणाऱ्या गाड्यांमुळे अनेक अपघात झाले असून आतापर्यंत काही जणांनी प्राण गमावले आहेत. लॉक डाऊन कालावधीतसुध्दा त्यात बदल घडला नाही. रेतीच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा आजही गंभीर आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने तापी पात्रातून रात्रंदिवस अवैध उपसा केला जातो. पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोज शेकडोच्या संख्येने डंपर जात असतात. रेतीवाहनांमध्ये जालना, औरंगाबाद, नाशिक, सांगली, भिवंडी अशा अनेक जिल्ह्यातील वाहनांचा अधिक समावेश आहे. नंदुरबारची रेती तस्करी राज्यव्यापी असल्याचे यातून ठळक होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र्र भारूड यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून वाळूूूू वाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यााास बंदी घालणारा आदेश 29 जून 2020 रोजी जारी केला होता. सात दिवसाचे सात पथके नेमून कायम निगराणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु हे सर्व केवळ देखावे करणारे ठरले असून रेती तस्करी निर्वेध चालू आहे. या अपघातामुळे पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.