वसई - ( मनीष गुप्ता ) वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशी वर्गाला याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.शासनाने लॉकडाऊन च्या काही अटी शिथिल करताच गावाला गेलेल्या आणि गल्ली बोळात उभ्या असलेल्या हजारो रिक्षा अचानक रस्त्यावर आल्या.गोरगरीब जनतेच्या प्रवासाच्या अडचणीचा व परिस्थितीचा पुरेपूर फायदा मात्र रिक्षाचालकांनी घेतला.ज्या ठिकाणी एका प्रवासाचे भाडे १० रुपये होते त्याच प्रवासाचे भाडे त्यांनी २० रु/३०रुपये घेणे सुरु केले आहे .फक्त २ प्रवासी असेल तर हे भाडे योग्य आहे. परंतु परिवहन कार्यालयाने कोरोना संक्रमण महामारीच्या अनुषंगाने फक्त २ प्रवाशी वाहून नेण्याची मुभा दिली असतांना हे मुजोर रिक्षाचालक आर.टी.ओ विभाग व वाहतूक पोलिसांचे नियम डावलून ३/४/५ असे प्रवाशी वाहून नेतात.व इतके प्रवाशी भरल्यानंतरही भाडे कमी न करता सर्वांकडून सारखेच पैसे घेतात.ही जनतेची लुबाडणूक असून ती ताबडतोब थांबलीच पाहिजे.१ डिसेंबर पासून परिवहन बस सेवा सुरु होणार आहे आणि सुरु झाल्यानंतर देखील रिक्षा चालकांनी केलेली ही भाडे वाढ कायम राहील ती कमी होणार नाही ती आताच दखल घेऊन रद्द करा.रिक्षाचालक कुठलेही सोशल डिस्टनशिंगचे पालन करीत नसून रिक्षात पडदा अंगात गणवेश चेहऱ्याला मास्क.हातात ग्लोज.सेनेटाइजर. फायर बाटला व प्रथमोपचार पेटीचा वापर करीत नसून हा विषय अत्यंत घातक व धोक्याचा आहे.जनतेची होणारी लूट लक्षात घेऊन या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा शहरसचिव श्री.राज नागरे यांनी उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्री.दशरथ वाघुले यांच्या तर्फे जनमाहिती अधिकारी श्री प्रकाश बागडे यांची व वहातूक नियंत्रण शाखा वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास सुपे यांची प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.यावेळी आर.टी.ओ.कडून अधिकृत रिक्षा स्टँड व त्यावर लावण्यात येणाऱ्या रिक्षाची संख्या निश्चित करा. रिक्षाचे भाडे अर्थात (दरपत्रक) यांचे फलक जनतेच्या माहितीसाठी प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर व स्टिकर स्वरूपाने रिक्षात लावा.आर.टी.ओ अधिकाऱ्यांनी ट्राफिक पोलिसांवर अवलंबुन न राहता स्वतः आठवड्यातुन किमान २ वेळा रिक्षा स्टॅन्डवर धाडी घालाव्यात.नियमबाह्य आढळून आल्यास संबंधित रिक्षा चालकावर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करावी. प्रवाश्याना एखाद्या रिक्षाचालकाची तक्रार करावयाची असल्यास त्यासाठी निवारण कक्ष. टोल फ्री नंबर सहित एक मोबाईल अँप तयार करा.त्याच प्रमाणे नालासोपारा शहरात काही एक संबंध नसलेल्या व मीरा-भाईंदर दहिसर बोरिवली कल्याण डोंबिवली सहित अन्य इतर ठिकाणावरून येऊन धंदा करणाऱ्या वाहतुकीची कोंडी करून शासनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकावर कायदेशीर कारवाई करावी.त्याचप्रमाणे आता सध्या स्थितीत स्वतःची मनमानी करीत रिक्षाचालकांनी केलेली बेकायदेशीररित्या भाडेवाढ स्वतःहून रद्द करण्याकरिता ते संलग्न असलेल्या प्रत्येक रिक्षा युनियनला पत्र देण्यात यावे. जे संलग्न नसतील त्यांना मेगाद्वारे वाहतूक पोलिसांतर्फे प्रत्येक स्टॅन्डवर जाऊन सूचना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली. लवकर निवेदनाची दखल घेऊन जनतेच्या हितासाठी दरवाढ रद्द करण्यासाठी ठोस कारवाई करू असे आश्वासन मनसे नालासोपारा शहरसचिव राज नागरे यांना प्रशासनाने दिले आहे.