गेल्या अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतरही राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा आकडा वाढत आहे. अशातच लॉकडाऊनचा तिसरा टप्पाही आता संपत आला आहे. त्यामुळे 17 मे नंतर लॉकडाऊनमध्ये कुठे आणि किती शिथिलता आणायची असा प्रश्न सरकारसमोर असणार आहे. त्यातच आता लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. या रेड झोन्समध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जाऊ शकतो. मात्र दुसरीकडे राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीबाबत आगामी काळात नेमका काय निर्णय होतो, हे पाहावं लागेल.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22 हजाराच्या पार झाली असून अजूनही अनेक रुग्ण वाढताना दिसता आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले तर आतापर्यंतच्या लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे. राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग-धंद्यांना परवानगी देण्यात आल्यानंतर या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊनबाबत अत्यंत सावधगिरीने निर्णय घेतला जाईल, हे तर स्पष्टच आहे.
लॉकडाऊनबाबत पंतप्रधान करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
लॉकडाऊन संपायला आता केवळ 6 दिवस रहिले आहेत. देशातला लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात आला होता. तो लॉकडाऊन 17 मे रोजी संपणार असून त्यानंतर काय होणार हा प्रश्न देशभर विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (11 मे) देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. पंतप्रधानांची कोरोना प्रकरण सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतची ही 5वी व्हिडीओ कॉन्फरन्स आहे. त्यात कुठला निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, महत्त्वाच्या विभागांचे केंद्रीय सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता ही व्हिसी होणार आहे.