महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत असतानाही हिंदुत्व सोडलेले नाही असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत असताना दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजनास्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा करत अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही असा खुलासा केला आहे.
अजानमुळे मनाला शांती लाभते, लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचंही सकपाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. तसंच “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,” असंही ते म्हणाले होते.
“अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं होतं.
खुलासा करताना काय म्हटलं आहे –
“मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. मी त्यांना सदर स्पर्धा घेण्यासंदर्भात करोनाविषयक नियम अवगत करुन दिले. तसंच सदर स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केल्यास करोना विषयक नियमांची पायमल्ली होईल हेदेखील सदर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले व सदर स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित करण्यास विरोध दर्शवला. मात्र यास शेवटचा पर्याय म्हणून ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यास सुचवलं आणि शुभेच्छा दिल्या,” असा खुलासा पांडुरंग सकपाळ यांनी केला आहे.
“अशा प्रकारच्या शुभेच्छा देताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारे धार्मिक अथवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे वेगळ्या अर्थाने राजकारण करण्यात येऊ नये,” असं आवाहनही त्यांनी केलं आहे