अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागांत शुक्रवारी (२४ जुलै) पावसाने हजेरी लावली. मराठवाडय़ाला पावसाने झोडपून काढले.
औरंगाबाद, बीड जिल्ह्य़ांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहरी भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार झाले. मात्र, धरणांतील पाणीसाठय़ात मोठी वाढ होऊ शकली. गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथे वडिलांसह दोन लहान भावंडे दुचाकीसह नदीत वाहून गेले. मुंबई, रत्नागिरीसह कोकण विभागात आणि पुणे, सोलापूरसह मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागांत सकाळपासूनच पावसाची हजेरी होती. दरवर्षी बहुतांश भागांत अपुरा पाऊस असलेल्या मराठवाडय़ात सध्या दमदार पाऊस होतो आहे. शुक्रवारी काही भागांत अतिवृष्टीही झाली. औरंगाबाद शहरासह बीड आणि जालना जिल्ह्य़ातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.