ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मागील काही दिवसांपासून वाद निर्माण झालेला असतानाच आता शिवसेनेने या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असं म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचं असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे. यावरुनच आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी थेट जावेद अख्तर यांच्या अटकेची मागणी केलीय.
‘सामना’च्या अग्रलेखामधून जावेद अख्तर यांची भूमिका योग्य नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. हाच लेख ट्विट करत राम कदम यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “जिलेबीसारखी गोल गोल भाषा? एका ठिकाणी शिवसेना मान्य करते आहे की जावेद अख्तर यांनी चुकीचे विधान केले आहे. मग वाट कसली पाहताय? आम्ही तक्रार करून २४ तास होऊनही त्यांना अटक का करत नाही? हिंम्मत असेल तर ठोका बेड्या? त्याच्या घरासमोर, राडा करण्यापासून कोणी रोखले तुम्हाला?”, असे प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केलेत. “जावेद अख्तर यांना माफी मागावी लागेल. त्यांनी भारतातला व्यवहार बघितला आहे. एकदा त्यांनी अफगाणिस्तानला जावे, तालिबानी व्यवहार बघावा. आपोआप त्यांना सद्बुद्धी सुचेल की हात जोडून माफी मागितली पाहिजे,” असंही राम कदम म्हणालेत.
शिवसेनेनं काय म्हटलं आहे?
“सध्या आपल्या देशात कोणीही कोणाला तालिबानी म्हणत आहे. कारण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे समाज व मानवजातीला सगळय़ात मोठा धोका आहे. पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही. भारताची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच,” असं म्हणत या लेखाची सुरुवात करण्यात आली आहे.