राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगर आणि कोकणात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातही पाऊस असेल असं सांगण्यात आलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
दक्षिण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील 48 तास चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 15 ते 17 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईत कुलाबा, नरीमन पॉइंट, मस्जीद बंदर, सांताक्रूझ परिसरात पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर सकाळी साधारण 8.13 दरम्यान मुंबईतील समुद्रात हाय टाइडचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यासह उपनगरांमध्येही पावसाचा लपंडाव सुरू आहे.
राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या धुवांधार पावसामुळे शेतांचे बांध देखील फुटून मातीसह अंकुरलेली पिकं वाहून गेली आहेत. कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद-मूग पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे