सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार : कुत्र्याच्या चाव्यामुळे जीव गमवावा लागल्यावरही ठेकेदारांना पोसणारे नंदुरबार पालिकेचे प्रशासन आणि सत्ताधारी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर गंभीर बनलेच नाही. शिवाय मुख्याधिकारी कक्षाबाहेर खुद्द नगरसेवकांनी निदर्शने केली आणि पालिकेच्या दाराशी मृतांचे पालक व कार्यकर्ते उपोषणाला बसले असतानाही सत्ताधाऱ्यांनी बेफिकीर, निष्ठुर कार्यपद्धती जारी ठेवली आहे. असे हे कुंभकर्णी प्रशासन पुन्हा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत न्याय न मिळाल्यास शहरबंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉ. चौधरी यांनी म्हटले आहे, की बेजबाबदार ठेकेदार, निर्बुद्ध प्रशासन आणि निष्ठुर सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. बालक आणि वृद्धांच्या श्वसन संबंधित आजाराला ते कारणीभूत ठरतात. अशा प्रसंगी वेळीवेळी शहरात औषध फवारणी करणे, कुत्र्यांना पकडून बंदोबस्त करणे, त्यांच्यावर उपचार करणे, नीर्बिजीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यावर गंभीर नाहीत. ही पद्धत नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणारी व निषेधार्ह आहे.
कुत्र्यांनी घेतला बळी
पालिका नागरिकांचे आरोग्य रक्षण आणि शहर स्वच्छतेत स्पशेल फेल ठरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने हिताक्षी माळी हिचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी कुत्र्यांचा झुंडीमुळे बलराज राजपूत या तरुणाचा जीव गेला. तरीही यांना जाग आलेली नाही. भाजपच्या नगरसेवकांनी नीर्बिजीकरणाच्या लाखो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या निष्ठुर कारभाराकडे लक्ष वेधले. मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना एक कोटीची भरपाई द्या, अशी मागणी लावून धरली. सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून घोषणाबाजी केली. शिवाय त्या मुलीला श्रद्धांजली वाहणारे बॅनर आणि पोस्टर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला लावून निदर्शनेही केली. त्या उपरांतही प्रशासन आणि सत्ताधारी कृतिशील होत नाहीत.