सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार- केंद्र सरकारने नवे कृषी विषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला नंदुरबार जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. बहुतांश ठिकाणी नियमितपणे व्यवहार चालू असल्याचे दिसून आले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद पाळला. तसेच विरोधी पक्ष, संघटनांनी लाक्षणिक स्वरुपातच मोर्चा, निदर्शने केले.
आज दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारलेला असतानाही नंदुरबार शहरातील प्रमुख बाजारपेठ सकाळपासूनच नियमितपणे सुरू झाली. व्यापारी संघटनांनी यात सहभाग घेतला नाही. जळका बाजार, मंगळ बाजार, सुभाष चौक, नेहरू चौक, सिंधी कॉलनी परिसर या सर्व ठिकाणी तसे पाहायला मिळाले. दुकाने, लाँऱ्या, विक्रेते, ग्राहक, नागरिक यांची वर्दळ सुरू होती. अपवादात्मक काही दुकाने काही अस्थापने बंद होती. भाजी विक्रेते सुद्धा नेहमीप्रमाणे विक्री करताना आढळले. तथापि कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ पुणे यांनी सर्व कृषी बाजार समित्यांना बंदमध्ये सामील होण्याचे सुचित केले होते. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आल्या. सर्व बाजार समिती आवारात त्यामुळे शुकशुकाट होता. दैनंदिन वीस पंचवीस हजार टन उलाढालीवर परिणाम झाला. भाज्यांचा घाऊक बाजार देखील बंद होता. दरम्यान नंदुरबार शहर पोलिसांनी मोर्चे काढणे निदर्शने करणे याला परवानगी नाकारली होती. त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काही शेतकऱ्यां समवेत नंदुरबार शहरातील नेहरू चौकापर्यंत मोर्चाने जाऊन प्रतीकात्मक निदर्शने केली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. बहुजन वंचित विकास आघाडी, ग्रामीण सत्यशोधक संघटना आदी संघटनांच्यावतीने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदने देण्यात आली तसेच घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. दुपारपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता.