नंदुरबार - श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे अस्वस्थ झालेल्या एका रुग्णाचा केवळ ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना नवापूर येथे घडली. या घटनेमुळे नवापूर शहरात तीव्र संतप्त भावना उमटल्या.
एकीकडे कोविड रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयात अशी कमालीची बेफिकिरी अनुभवायला मिळत असल्याची ओरड वाढली आहे.
रुग्णाच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा न्यायालयात वरिष्ठ अधिकारी असलेले किसन गवित नवापूर शहरात गणेशहिल भागातील रहिवासी होते. रविवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून त्यांना तातडीने उपचार करण्यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी येथे बेड शिल्लक नाहीत, असे कारण देत गावित यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. ताबडतोब व्यारा (गुजराथ)ला घेवून जा; असे सांगितले. रुग्णास श्र्वासोश्र्वास घेण्यास त्रास होतोय म्हणून किमान ऑक्सिजन सिलेंडर तरी द्या, अशा विनवण्या नातलगांनी त्या कर्मचाऱ्यांना केल्या. मात्र देण्यात आलेल्या त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजनच नव्हता व ते सिलेंडर भरलेलेही नव्हते. परिणामी अवघ्या काही किलोमिटरवर सोनगडनजिकच त्या सिलेंडर मधील ऑक्सिजन संपला. परिणामी सोनगड ते व्यारा व व्यारा ते बारडोली अशा धावपळीत ऑक्सिजनविनाच ते तळमळत राहिले. अखेर बारडोलित दाखल होत असताना त्यांचा मृत्यू झाला; असा दावा करण्यात आला. पुरेसा ऑक्सिजन पुरवठा झाला असता तर ती व्यक्ति जिवंत राहीली असती; असे या नातलगांचे म्हणणे आहे. कामात असला हलगरजीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.