सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील खंडामोळी गावात विकासाच्या नावाखाली वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चक्क सरपंचपदासाठी 42 लाखांची बोली लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षांनी मारलेल्या या बाजीचा गावातील इतर समाजाकडून विरोध होत आहे.
साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या खोंडामोळी ग्रामपंचायतीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विकासाच्या नावाखाली गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी ज्या पक्षाकडून जास्त निधी दिला जाईल त्यांना ग्रामपंचायत बिनविरोध करून सरपंचपद देण्यात येईल. यासाठी गावातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत सर्वच पक्षांकडून सरपंच पदासाठी बोली लावण्यात आल्याची चर्चा आहे 25 लाखांपासून तर 42 लाखांपर्यंत झालेल्या या बोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप वना पाटील यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळून गावाचा विकास व्हावा, यासाठी झालेला प्रयत्न योग्य आहे, परंतु सरपंच पदासाठी झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांनी व्यक्त केली आहे.