मुंबई: राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय अगदी योग्य असून त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. तसेच, राज ठाकरे हे अगदी मोकळ्या मनाचा माणूस असून ते कद्रू किंवा कोत्या मनोवृत्तीचे नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आम्ही सगळे एकत्र आलो तर निवडणुकीत त्याचा फायदा होणारच आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचं, याचा विचार होऊ शकतो, आता काहीच ठरलेले नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.