रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या संकटात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेनं त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रातील बँक ‘येस बँके’नं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं आहे. तसंच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचं १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला बँकेनं २ हजार ८९२ कोटी रूपयांचं कर्ज दिलं होतं. ही प्रक्रिया त्या कर्जाच्या रकमेच्या परतफेडीसाठी करण्यात आली आहे, असं येस बँकेकडून सांगण्यात आलं. याव्यतिरिक्त बँकेनं रिलायन्सची नागिन महल येथील दोन कार्यालयेही आपल्या अधिकारांतर्गत घेतली आहे. डिफॉल्टर्सचे असेट्स आपल्या ताब्यात घेत त्याची विक्री करण्याचा अधिकार बँकांना आहे.
कारवाईपूर्वी नोटीस
सध्या येस बँकदेखील एका मोठ्या संकटातून जात आहे. बँकेवर मोठ्या प्रमाणात ‘बॅड लोन’चं ओझं आहे. ते कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न बँकेकडून केले जात आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावरही बँकांचं १२ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. कारवाई करण्यापूर्वी बँकेनं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला ६० दिवसांती नोटीस पाठवली होती. ५ मे रोजी याची मुदत पूर्ण झाली. परंतु कंपनीकडून कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही. त्यानंतर बँकेनं SARFAESI Act 2002 अंतर्गत कारवाई केल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं. आपल्या संपत्ती विकावी लागली तरी चालेल पण आपण बँकांचं सर्व कर्ज फेडणार असल्याचं यापूर्वी अंबानींनी म्हटलं होतं.