कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) वाचण्यासाठी जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन (lockdown) लागू केला. कोरोनापासून वाचवणाऱ्या या लॉकडाऊनने आणखी एका समस्येतून बाहेर काढलं ते म्हणजे प्रदूषण. कोरोनाव्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आणखी एक फायदा झाला तो म्हणजे जगातील प्रदूषणाचं (pollution) प्रमाण कमी झालं.
लॉकडाऊनमध्ये आपल्यासमोर जगाचं असं चित्र दिसलं, ज्यावर आपण विश्वासही ठेवणार नाही. भारतात दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरातील हवेची गुणवता लक्षणीय प्रमाणात सुधारली. पंजाबमध्ये 200 किमी दूरहून लाहोरमधील डोंगर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून हिमालय स्पष्टपणे दिसू लागले. त्याचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले.
प्रदूषणामुळे कित्येक लोकं आपला जीव गमावतात. तर काही जणांना अस्थमा, अॅलर्जी, मायग्रेनसारख्या समस्यांचा आयुष्यभर सामना करावा लागतो. द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते तात्पुरत्या स्वरूपात लॉकडाऊन प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याचा एक मार्ग आहे. लॉकडाऊनमुळे वायूप्रदूषणासह ध्वनी आणि जल प्रदूषणही कमी झालं आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं.
पीटीआयशी बोलताना बंगळुरूच्या सेंटर फॉर अॅटमोस्फिअर अँड ओसियनिक सायन्स, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सचे प्राध्यापक एस. के. सतीश यांनी सांगितलं, "हवेच्या गुणवत्तेवर लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. दक्षिण भारतातील क्षेत्रात सूक्ष्म धूलिकणांचं प्रमाण 50 ते 60 टक्के कमी झालं आहे. तर दिल्ली, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल या ठिकाणी 75 कमी झालं आहे. मानवी क्रियांवर बंधनं हे यामागील सर्वात मोठं कारण आहे. शहरी भागात सर्वात जास्त प्रदूषण गाड्यांमुळे होतं. लॉकडाऊनमध्ये वाहतुकीवर बंदी होती, फक्त आपत्कालीन सेवेतील वाहनं सुरू होती"
आयआयटी गांधीनगरच्या अर्थ सायन्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक मनीष कुमार सिंग म्हणाले, "लॉकडाऊनमध्ये निसर्गात ज्या प्रमाणे बदल दिसून आले, ते पाहता भविष्यात प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनसारखा पर्यायाचा अवलंब करू शकतो, असं मला वाटतं"