अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं (Ram mandir ayodhya) भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतरची नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ही पहिलीच अयोध्या भेट असणार आहे. भूमिपूजनासाठी 5 ऑगस्ट ही तारीख का निवडली याची चर्चा आता होत आहे. पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी याविषयी दोन महत्त्वाची कारणं सांगितली आहेत.
सोमण यांचा पंचाग आणि खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास आहे. ते म्हणाले, भारतीय पंचांगाप्रमाणे 5 ऑगस्ट हा वास्तूशास्त्राचे जे मुहूर्त सांगितले आहेत त्यात हा महत्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी घनिष्टा नक्षत्र सकाळी 9.30 वाजेपर्यंत आहे. नंतर चंद्र शततारका नक्षत्रात जाणार आहे. घनिष्टा आणि शततारका हे शुभ नक्षत्र मानले जातात. वास्तूशास्त्रासाठी हा दिवस अत्यंत पवित्र समजला जातो.
त्याचबरोबर श्रावण महिनाही सुरु झाला आहे. हा महिना भारतीय संस्कृतीत पवित्र समजला जातो. राम मंदिरासाठीची जी कामे आत्तांपर्यंत करण्यात आली त्यातली महत्त्वाची कामे ही ऑगस्ट महिन्यात झाली आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
राम मंदिर निर्माणासाठी तयार केलेल्या ट्रस्टमध्ये असलेल्या साधुसंतांनी सखोल चर्चा आणि विचार करून 5 ऑगस्ट ही तारीख निवडली होती. या दिवशी पंतप्रधानांना येणं शक्यच नसेल तर 3 ऑगस्ट हा पर्यायही सुचविण्यात आला होता.