नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. कोरोना विषाणू हा नैसर्गिक नसून तो लॅबमध्ये तयार झाला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असा दावा त्यांना केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. जर हा विषाणू नैसर्गिक असता तर त्यावर इतक्यात लस उपलब्ध झाली असती. कोरोना विषाणू कुठे तयार झाला याच्या वादात मला उतरायचे नाही. मात्र, जेव्हा कारोनाची लस येईल, तेव्हाच आपण निर्धास्त जगू शकतो. तोपर्यंत कोरोनासोबत जगण्याची मानसिकता आपल्याला तयार करायला हवी, योग्य ती काळजी घेऊन, सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच पुढे जायला हवे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
गडकरी म्हणाले, कोरोनाच्या संकटात आपण आर्थिक लढाईही लढत आहोत. भारतासारखा गरीब देश जास्त काळ लॉकडाऊन झेलू शकत नाही. आपल्याला सुरक्षेची खबरदारी घेत बाजार, कार्यालये खुली करावी लागतील. अमेरिका, ब्रिटन, इटली सारख्या देशांपेक्षा भारतातील स्थिती सुधारत आहे. या देशांशी संदर्भातील संक्रमणाच्या प्रकरणांत सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळले आहे. सलून सुरू व्हायला हवीत, सोशल डिस्टंसिंगची नियमावली पाळून दुकाने खुली करायला हवीत. सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरूनच ही लढाई पुढे लढायला हवी, असे गडकरी म्हणले. श्रमिकांना त्यांच्या मालकांनी आश्रय आणि जेवणाची व्यवस्था करायला हवी. या लढाईत केवळ कोरोनाशी लढण्याची नाही तर स्वतःचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवण्याची आहे.
भीतीमुळे प्रवासी मजूर घरी परतत आहेत. जेव्हा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग पुन्हा सुरू होतील, तेव्हा त्यांना परतावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसएमई क्षेत्राला आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे याचा फायदा नक्की होईल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या आता ७५ हजारांवर पोहोचली आहे. या विषाणूमुळे २ हजार ४१५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, सकारात्मक बाब म्हणजे २४ हजार ३८६ रुग्ण आता बरे होऊन घरी परतले आहेत. ४७ हजार ४८० रुग्ण अजून उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, त्यात मुंबई हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे शहर बनले आहे.