भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. 2021-22 या कालावधीसाठी भारत आशिया आणि पॅसिफिक प्रवर्गातून अस्थायी जागेसाठी उमेदवार होता. आशिया-पॅसिफिक गटाने भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. यामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यासह 55 सदस्यांचा सामावेश होता. ज्यामुळे भारताची निवड बिनविरोध झाली. कॅनडाला मात्र UNSC मध्ये स्थान मिळू शकलं नाही.
भारताला एकूण 192 मतांपैकी 184 मतं मिळाली. 2020-2022 दोन वर्षासाठी भारताची निवड झाल्याचा आनंद आहे.संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे अशी प्रतिक्रिया UNSCमधील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली आहे.
भारताची ही झालेली निवड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि जागतिक नेतृत्त्वाला बळकटी देणारं आहे. कोरोनाच्या संकटानंतर भारत बहुपक्षीय व्यवस्थेला दिशा देईल असा विश्वासही तिरुमूर्ती यांनी व्यक्त केला आहे.
भारताची 8 व्यांदा UNSC च्या अस्थायी सदस्यपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेनं आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी यूएनएससीमध्ये 10 पैकी 5 अस्थायी सदस्यांसाठी दोन वर्षांच्या मुदतीसाठी निवडणुका घेतल्या जातात. या 10 जागा प्रादेशिक तत्वावर देण्यात आल्या आहेत. आफ्रिका आणि आशियाई देशांसाठी पाच जागा वितरित केल्या आहेत, एक पूर्व युरोपियन देशांसाठी, दोन लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांसाठी आणि दोन पश्चिमी युरोपियन आणि अन्य राज्यांसाठी आहेत.