मुंबई, 10 मे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर रविवारी मध्यरात्री दीड वाजता पहिलं विमान मुंबईत पोहोचलं. 325 प्रवाशांना घेऊन हे स्पेशल विमान लंडनमधील हिथ्रो एअरपोर्टहून निघालं होतं.
लंडनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी आणि यात्रेकरु अडकले होते. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर सगळ्यांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत रविवारी येणार तीन विमान..
विदेशात अडकलेले 813 भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत रविवारी मायदेशात आणले जाणार आहे. लंडनहून मुंबईत पहिले विमान दाखल झालं आहे. त्यानंतर सिंगापूर आणि मनीला येथून दोन विमाने मुंबईत पोहोचणार आहेत.
सिंगापूरहून 243 प्रवाशांना घेऊन निघालेलं एक विमान दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला मुंबईत पोहचेल. तर तिसरे विमान मनीलाहून 241 प्रवाशांना घेऊन निघेल. ते रविवारी रात्री 11 वाजता मुंबई एअरपोर्टवर पोहोचेल.
दरम्यान कोरोनाच्या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकारने सुरु केलं आहे. 7 ते 13 मे या कालावधीत एअर इंडियाच्या विमानांच्या 64 फेऱ्या होणार आहेत. त्यात 14 हजार 800 भारतीयांना परत आणले जाणार आहे.
एअर इंडियाची 64 विमान आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस 12 देशांमधील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. या देशांमध्ये युएई, यूके, अमेरिका, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, कुवैत आणि ओमानचा समावेश आहे.
युएईसाठी 10 उड्डाणे होतील. सुमारे दीड लाख भारतीय युएईमध्ये अडकले आहेत. त्याशिवाय अमेरिकेला सात, युकेला सात, सौदी अरेबियाला पाच, सिंगापूरला पाच आणि कतारला दोन विमाने उड्डाण करतील.