कोरोनामुळे सर्वच राज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा महसुलही कमी प्रमाणात गोळा झाल्याने खर्च कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याने नवे वाहन खरेदी करू नये, असे आदेश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
आर्थिक अडचणींमुळे राज्यात कोणतीही नवी योजना लागू करण्यात येणार नाही. केंद्र सरकारच्या योजनांना देण्यात येणारे पैसेही यापुढे एकरकमी न देता टप्प्याटप्याने देण्यात येतील. गरज नसलेल्या योजनांना स्थगिती देण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानामुळे सरकारकडे रिक्त असलेली कोणतीही पदे भरली जाणार नाहीत.
तसेच सरकारी कार्यालयातील खर्च, प्रवासाचा खर्च, स्टेशनरी, विश्रांतीच्या प्रवासाच्या सुविधांचा खर्च 25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव वित्त संजीव कुमार मित्तल यांनी या खर्चावरील कपातीसंदर्भात आदेश जारी केला. लॉकडाऊनमुळे सरकारच्या महसुलात कमालीची घट झाली आहे, असे या आदेशात म्हटले आहे. या परिस्थितीत संसाधनांचा योग्य वापर आणि रोकड व्यवस्थापनासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.