चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे रविवारी मोठा हिमकडा कोसळला. यामुळे नदीला महापूर आल्यानं पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता झाले असल्याची भीती वर्तवण्यात येत होती. या लोकांचा आकडा आता समोर आला असून 170 लोकं बेपत्ता झाली असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
SDRF टीम या घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. याठिकाणी काही लोक बोगद्यामध्ये(Tunnel) अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, टनल उघडण्यासाठी मशीनही याठिकाणी आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती निवारण दल यांच्यासह भारत-तिबेट सीमा पोलीस कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
चमोली पोलिसांनी नुकतंच ट्वीट करत बचावकार्याबद्दलची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं, की टनलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेसीबीच्या मदतीनं टनलमध्ये पोहोचून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 15 व्यक्तींना वाचवण्यात यश आलं असून 14 लोकांची मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणांहून हाती लागले आहेत.बचावकार्यासाठी भारतीय वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टरही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बचावकार्य वेगानं सुरू असून आणखी बरेच लोक टनेलमध्ये अडकल्याचा संशय आहे. उत्तराखंड राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबास 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती, मुख्यमंत्री रावत यांनी दिली आहे. तर, केंद्र सरकारकडून दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.