केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा ( Motor Vehicle Rules) लागू केला आहे. देशभरात 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये नवीन तरतुदी केल्या आहेत. या नव्या अधिनियमातील तरतुदींनुसार एखाद्या छोट्याशा चुकीमुळं तुमचं लायसन्स जप्त होण्याचीही शक्यता आहे. वाहतूक पोलीस नव्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन, खासगी आणि व्यावसायिक वाहन चालकांवर नजर ठेवणार आहेत. त्याचबरोबर या नवीन सुधारित नियमांनुसार आरसी बुक, इन्शूरन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्यासोबत न बाळगता त्याची सॉफ्ट कॉपी सोबत ठेवली तरीही चालणार आहे.
त्याचबरोबर या नवीन तरतुदींनंतर पोलिसांची देखील जबाबदारी वाढली आहे. पोलिसांना त्यांच्या रोजच्या कामाची किंवा कारवाईची नोंद करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही नोंद कागदावर नसून ती वाहतूक शाखेच्या पोर्टलवर करावी लागणार आहे. यामध्ये पोलिसांना या ऑनलाईन पोर्टलवर दंडाची रक्कम, वाहन चालकांवर केलेली कारवाई, त्याची कारणं, या सगळ्याचा उल्लेख करावा लागणार आहे. रोजच्या रोज ही नोंद करावी लागणार आहे. दंड केलेल्या ड्रायव्हरच्या वर्तनाचा उल्लेखही पोलिसांना पोर्टलवर करावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात कारवाई करताना पोलिसांना देखील सोपे जाणार असून वाहन चालकांना देखील नाहक त्रास होणार नाही.
या नवीन तरतुदींनुसार, पोलिसांनी एखाद्या वाहन चालकाला पकडल्यानंतर त्या वाहन चालकाचं वर्तन कसं आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांशी हुज्जत घालणे, गाडी न थांबवणे अशा गोष्टींवर पोलीस कडक कारवाई करू शकतात. त्याचबरोबर ट्रकचालकांनी त्यांच्या केबिनमधून प्रवासी वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवणे, गाडी चालवताना सिगारेट ओढणे, या प्रकारांमुळे ड्रायव्हर अडचणीत येऊ शकतो. दरम्यान, या नवीन तरतुदींमध्ये गाडी चालवताना मोबाईलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण यामध्ये केवळ गुगल मॅपचा वापर करण्यासाठी मोबाईलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोबाईल फोनवर गप्पा मारत गाडी चालवण्यास परवानगी नाही.