अहमदनगर : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना नगर पोलिसांनी ताब्यात घेतल असुन देसाई आज शिर्डीला बोर्ड हटविण्यासाठी जात असताना त्यांना अहमदनगरच्या सुपे टोलनाक्यावर अडवण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिर्डीपासून 100 किलोमीटर आधीच तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असुन थोड्याच वेळात त्यांना सुपे पोलिस स्टेशनला घेऊन जातील, अशी माहिती आमच्या सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, आज मानवाधिकार दिन आहे, त्या दिवशी आम्हाला अडवलं असुन साई संस्थाननं लावलेला बोर्ड हटवण्यासाठी मी जात आहे. पोलिस म्हणत आहेत, चर्चा करा. मात्र संविधानाच्या अधिकाराचं हनन आहे. आमची भूमिका आहे की पोलिसांनी आमच्यासोबत यावं आणि बोर्ड हटवण्यास मदत करावी. असा निर्णय घेणाऱ्या शिर्डी संस्थानवर कारवाई करायला हवी मात्र इथं आम्हालाच अडवलं जात आहे असं त्या म्हणाल्या. प्रशासनाने काहीही केलं तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं असुन आम्ही शांततापूर्ण वातावरणात जात आहोत. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, मात्र आम्ही जाणारच आहोत, असं देसाई म्हणाल्या.
तृप्ती देसाई यांनी यावेळी साई बाबा शिर्डी संस्थानला त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. देसाईच्या या इशाऱ्यानंतर आज सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.