तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा गाभारा आकाराने लहान आहे. भाविकांची सुरक्षितता ध्यानात घेऊन दर्शनासाठी काय उपाययोजना आखता येतील याबाबत आढावा घेण्याचे काम सुरू आहे. दर्शनरांगेत गर्दी न होता सुरक्षित अंतर पाळून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिर संस्थानचे विश्वस्त असलेले तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी त्यावर काम करीत आहेत. शासनाच्या निर्देशांतर प्रत्यक्ष दर्शन सुरू करताना हा अहवाल उपयुक्त ठरणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाच्यावतीने दिवेगावकर यांचे स्वागत करण्यात आले तसेच करोना परिस्थितीसह भविष्यातील विविध विकास कामांबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
राज्य सरकारने स्पष्टपणे निर्देश दिल्यानंतरच तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मात्र, सामाजिक अंतर पाळून किती लोक दर्शन घेऊ शकतात? याबाबतची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यापूर्वी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिल्या आहेत. भविष्यात जेव्हा मंदिर सुरु होईल, तेव्हा फिजिकल डिस्टंसिंग पाळून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने दर्शनरांग सुरु ठेवण्यासाठी या अहवालाची मदत होईल. देवी मंदिराचा गाभारा लहान असल्यामुळे एकावेळी कितीजण दर्शन घेऊ शकतील? याचा अंदाज सध्या घेतला जात आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच भविष्यात निर्णय घेतला जाईल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांची संख्या निर्धारित करावी लागेल. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबत योग्य निर्णय होईल, असेही जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील करोना संक्रमणाची सद्य परिस्थिती पाहता आणखी व्यवस्था वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात ४ हजार २०० खाट उपलब्ध आहेत. त्यात आणखी अडीच हजार खाटांची वाढ करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन खाटांची संख्या आजमितीला आठशे असून आणखी नऊशे खाटा वाढविण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. उस्मानाबाद आणि उमरगा येथे प्रत्येकी तीन ठिकाणी तर अन्य तालुक्यात प्रत्येकी एक ठिकाणी अशा एकूण बारा ठिकाणी कोरोना तपासणीचे केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील तीन महिने आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. उस्मानाबाद शहरातील चार खासगी दवाखान्यांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, अद्याप एकाही रूग्णाला त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याची माहिती आहे. या सर्व रूग्णालयांच्या डॉक्टरांची आपण बैठक बोलावली आहे. त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. तशी भूमिका न घेतल्यास नाइलाजाने पुढील पावले उचलावी लागतील, असेही दिवेगावकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रूग्णांच्या दगावण्याचे प्रमाण सध्या २.६ टक्के एवढे आहे. हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी व्हायला हवे. त्यासाठीही विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रूग्णांना कोणत्या ठिकाणी खाटांची सुविधा आहे, याची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी अधिक सूक्ष्मपणे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कामाला लावली आहे. पुढील तीन महिने अधिक आव्हानात्मक आहेत. या कालावधीत इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा पूर्णतः सहकार्य करेल, अशी अपेक्षाही दिवेगावकर यांनी यावेळी व्यक्त केली