आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. फेसबुकवर सविस्तर पोस्टद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली.
या संदर्भात फडणवीस यांनी सरकारपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असं त्यांनी म्हटलं आहे. “कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला पण त्यावर हायकोर्टाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला होता. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली त्यावर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ही रक्कम २०१५ मध्ये सुमारे २,४०० कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? असा सवाल विचारताना हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? शिवाय कांजूरमार्गची जागा मर्सी लँड असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान २ वर्षांचा अवधी लागेल. याशिवाय आत्तापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल. या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेला नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
यामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल असल्याचेही ते म्हणाले.