महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार पुढील कालावधीत लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसामध्ये तब्बल 60 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले, तर 350 पेक्षा अधिक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
राज्यात कडक लॉकडाऊन करावा का, याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली. त्यात अनेक डॉक्टरांनी लॉकडाऊनचा आग्रह धरल्याचे समजते. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राज्यात पुढच्या कालावधीमध्ये कडक लॉकडाऊन लागू केला गेला तर छोटे व्यापारी वर्ग तसेच दैनंदिन रोजीरोटी कमावणारे गोरगरीब वर्ग यांना काहीसा आर्थिक दिलासा देता येईल, का याची चाचपणी आज महाराष्ट्र राज्यातील अर्थ खात्याचे अधिकारी करणार आहेत.
'इतर राज्यांमध्ये गोरगरीब लोकांना थेट खात्यांमध्ये पैसे दिले होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही लॉकडाऊन करायचा असेल तर गोरगरीब लोकांच्या खात्यात थेट आर्थिक मदत करावी. तसेच अन्नधान्य आणि इतर सुविधा द्याव्यात,' अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यावर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टास्क फोर्सने कोणत्या सूचना दिल्या?
"95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे, एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे," अशा सूचना मुख्यमंत्र्यंसोबतच्या बैठकीत टास्क फोर्सने दिल्या आहेत