'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'मंदिरा'लयच सुरू करायचे होते. मात्र, "म" वरचा अनुस्वार चुकल्याने राज्यातील मदिरालय सुरू झाली' अशी खोचक टीका अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.
नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मंदिरं सुरू करण्याच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'राज्यातील रेस्टॉरंट, बार, दारूची दुकाने सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळं मात्र अजूनही बंदच आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात महिला दहा दिवस उपवास करतात. देवीचे दर्शन घेतात, मात्र, मंदिरं बंद असल्यामुळे आता महिलांना देव दर्शनापासून मुकावं लागणार असल्याने नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांना देवीने सुबुद्धी द्यावी आणि लवकरच मंदिर सुरू व्हावे', अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यातील महिलांवर सातत्याने अत्याचार वाढत असल्याने या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसाचे अधिवेशन बोलवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करून महिलांना भेट द्यावी, अशी अपेक्षा देखील नवनीत राणा व्यक्त केली.
'राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, मुख्यमंत्री केवळ पंचनामे करू, पंचनामे करू एवढंच सांगतात, आता ही वेळ पंचनामे करण्याची नाही तर थेट शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही राणा यांनी केली.