पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला बांगलादेश दौरा चांगलाच चर्चिला गेला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याचा दावा केला आणि देशभरातून याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मोदींचा हा दावा अवास्तव असल्याची टीका करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनंही उपरोधिक शब्दांत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
'देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ व पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात,' अशी तिरकस मागणी करत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून नरेंद्र मोदी यांच्या दाव्यावर टीका करण्यात आली आहे. 'बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री. मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.