पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचे नाव दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यामुळे त्यांना 'पुण्यश्लोक' म्हणतात. यांना जन्म १७२५ साली बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहल्याबाईचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी- खंडेरावांशी झाले. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता. खंडेरावांपासून त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अशी दोन अपत्ये झाली. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावल्यामुळे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांना वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये, हे राज्य सांभाळायचे आहे. आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्या वेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखत असत. मल्हारराव होळकरांचे १७६६ मध्ये निधन झाले. आणि अहिल्याबाईवर फार मोठी जवाबदारी येऊन पडली.
त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. १७६७ साली अहिल्याबाईचा राज्याभिषेक झाला. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालवला.
पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांच्या
राज्यकारभाराचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या काळातील राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल.
त्या काळात भारतातील राजकीय परिस्थिती फारच अस्थिर होती. भारतातील सर्वच संस्थाने आपले राज्य वाढविण्यासाठी आपापसात लढत होती. १७६१ ला पानिपतच्या दारुण पराभवामुळे मराठा राज्याचे फार नुकसान झाले होते. इंग्रज भारतात आपली सत्ता स्थापण्यासाठी आणि विस्तारासाठी प्रयत्नात होते.
इंग्रजांनी १७५७ ला प्लासीची लढाई जिंकून बंगाल प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणला. इंग्रजांनी १७६४ ला बक्सरचे युद्ध जिंकून पूर्वोत्तर भारतात आपली सत्ता स्थापित केली. पेशव्यांच्या भाऊबंदकीमुळे इंग्रजांनी दक्षिण भारतातपण आपले पाय पसरवायला सुरवात केली. जरी अहिल्याबाईंनी कोणत्याही मोठ्या युद्धात भाग घेतला नाही, तरी त्यांनी आपल्या राज्याचे रक्षण केले. भारतात प्रजेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एकही राज्य नव्हते. अश्या परिस्थितीत अहिल्याबाईंनी फक्त इंदुरलाच नाही तर संपूर्ण भारतात धार्मिक आणि सामाजिक कार्य केले.
पुण्यश्लोक अहल्याबाई सुधारणावादी राज्यकर्ती होत्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची वस्त्रे तयार होतील, अशी पेठ कायम केली. त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतूहिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यात विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणान्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथस्थशाळा, आश्रयशाळा बांधल्या.
गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत. थंडीच्या दिवसांत घोंगड्या वाटल्या जात. अहल्याबाईंनी अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामे या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंड, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना
भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मागरिट म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅधेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ
डेन्मार्कची राणी मागरिट यांच्याशी केली आहे. (इ.स. १७२५ - इ.स.१७९५ या राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स.१७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली
राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईनी इ. स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर एक कुशल प्रशासक होत्या. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबतीत तज्ज्ञ राज्यकर्ताच कुशल प्रशासक होऊ शकतो.
त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्यांनी संपूर्ण भारतात केलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला. त्या काळी भारतात हिंदूंची आणि हिंदुधर्माची फार वाईट स्थिती होती. मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंची देवळे तोडून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडत किंवा त्यांना मारून टाकत. फक्त अहल्याबाईंनीच हिंदू, हिंदुधर्म आणि हिंदूंच्या देवळांचे रक्षण केले. भारतात अनेक कर्तव्यवान स्त्रिया झाल्या, पण ज्या स्त्रियांनी युद्धे जिंकली फक्त त्यांचेच स्मरण केले जाते. अहल्याबाई होळकरांनी केलेल्या कामामुळेच त्या अजरामर झाल्या.