राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (26 जून) पुण्यात महत्त्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे, राज्यात यापुढं लॉकडाऊन नसणार आहे. आता केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल. राज्यात आता अनलॉक 2-3 असेल, असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत याची चिंता नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढत आहे, याबाबत आहे, असेही टोपेंनी यावेळी सांगितलं. विरोधकांच्या टीकेत तथ्य नाही. कोरोनामुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरु असंही ते म्हणाले
महाराष्ट्र, मुंबई पुण्यामध्ये चाचण्या कमी झाल्या यात तथ्य नसल्यांचंही ते म्हणाले. देशात सर्वाधिक चाचण्या या मुंबई, पुण्यात घेण्यात आल्या. 1 लाखामागे मुंबईत 22 हजार आणि पुण्यात 15 हजार चाचण्या होत आहेत. काही रुग्ण मृत झाल्यानंतर कोरोना पॉजिटिव्ह येत असल्यानं त्यांची संख्या नंतर वाढत आहे.
पुणे आणि सोलापुरात कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख आढावा घेत असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी 1लाख अँटी जेन चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा यावेळी टोपेंनी केली आहे
पुण्यात ससून रुग्णालयात वरिष्ठ प्राध्यापक आणि सहप्राध्यापक कोरोना वार्डात जात नाहीत, अशा तक्रारी निवासी डॉक्टरांकडे आल्या आहेत. मात्र, त्यात तथ्य नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं