पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना विषाणूच्या संकटाविषयी चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधानांची ही बैठक सोमवारी दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या मुद्यावरही चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान, रविवारी मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य आरोग्य सचिवांशी चर्चा केली.
पंतप्रधान-मुख्यमंत्री सुसंवादामध्ये 17 मे नंतर म्हणजे लॉकडाऊन-3 नंतर परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी याबाबत चर्चा होणार आहे. तसेच काही राज्यांमध्ये अजूनही मजूर व कामगार अडकून पडले असून ते आपल्या मूळ गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही राज्यांनी परप्रांतियांच्या परतीबद्दल चिंता व्यक्त केली. स्थलांतरितांच्या परताव्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे ग्रीन झोनमधील भाग रेड झोनमध्ये बदलले जाण्याची भीती विविध राज्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या स्थितीवर कशाप्रकारे तोडगा काढला जातो याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.
50 दिवसात पाचव्यांदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पाचव्यांदा देशातील मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत.
पंतप्रधानांनी गेल्या पन्नास दिवसांमधील ‘लॉकडाऊन’च्या काळात आतापर्यंत चारवेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधलेला आहे. यापूर्वी 20 मार्च, 2, 11 आणि 27 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
सचिव पातळीवरही चर्चा
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी रविवारी राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्य सचिव आणि सर्व आरोग्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलणी केली. यावेळी बऱयाच जणांनी त्यांच्यासमोर स्थलांतरितांच्या घरवापसीमध्ये येणाऱया अडचणींबाबत माहिती दिली. अनेक राज्यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बनवलेल्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले
लॉकडाऊनची मुदत वाढणार का?
आतापर्यंत देशात तीनवेळा ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. 25 मार्चपासून सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर झाले. ते 21 दिवस लावण्यात आले होते. त्यानंतर 14 एप्रिलपासून 3 मेपर्यंत दुसरे आणि 4 मे पासून तिसरे लॉकडाऊन सुरू झाले आहे. आता ही मुदत 17 मे रोजी संपणार असली तरी कोरोना संसर्ग बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार का? याबाबत सर्वांनाच चिंता लागलेली आहे.